भाजपाच्या झारीत शुक्राचार्य किती ?
साकोली/- आधी देश, नंतर पक्ष, मग मी असा स्वाभीमानाचा बुलंद नारा देणारा व अत्यंत शिस्तप्रिय पक्ष म्हणून केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही ओळख असणारा एकमेव पक्ष जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे. कधी एकही खासदार नसलेला पक्ष आपल्या मूल्यांवर ठाम राहून आता तीसऱ्यांदा या देशाचा राजकारभार चालवत आहे.
पंतप्रधान मोदींच्या त्सुनामी लाटेत महाराष्ट्रात २०१४ साली भाजपा व महायुतीची एकहाती सत्ता होती. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष होता. परंतु सत्तेच्या लालसेपोटी मित्रपक्षांच्या दगाफटक्यांचा भाजपाला फटका बसला आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. तब्बल अडीच वर्षे भाजपा सत्तेपासून दूर होती तरीही भाजपा नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा संयम, स्वाभीमान, आत्मविश्वास व शिस्त अटळ होती.
परंतु मागील दोन-अडीच वर्षात महायुतीच्या सत्तेची रसाळ फळे नेत्यांसोबत कार्यकर्त्यांनासुद्धा चाखायला मिळाली. या दोन वर्षात सत्तेच्या वाहत्या नदीत अनेकांनी आपले हात धुवून घेतले तर काहीजणांची बकासुरी भुक अजूनही मिटलेली नाही. कदाचित त्यामुळेच गटातटाच्या राजकारणाने राज्यात कधी नव्हे ती भाजपाची अनेक शकले पडत गेली. मग यात भंडारा जिल्हा मागे कसा राहणार? आणि त्याचाच सर्वात मोठा फटका भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीत भाजपा उमेदवाराच्या पराभवाने भाजपाला बसला.
या पराभवापासून कोणतीही शिकवण न घेता किंवा मंथन न करता आपल्या पराभवाचे खापर मित्रपक्षावर फोडून भंडारा जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांनी स्वतःच्या जबाबदारीपासून स्वतःची मुक्तता करून घेतली. परंतु पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे हे पक्ष श्रेष्ठींच्या लक्षात आले नाही की त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला नाही यात शंका वाटते.
आता २०२४ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतही गटातटाच्या राजकारणाने भाजपाला पार फोडून काढले आहे. कधीकाळी संपूर्ण जिल्हा काँग्रेसमुक्त करणाऱ्या या पक्षाजवळ आता एकमेव साकोली विधानसभा हा क्षेत्र आहे. परंतु या विधानसभा क्षेत्रात दहा वर्षांपूर्वीच्या नेत्यापासून तर सहा महिण्यांपूर्वीच्या नेत्यांनी स्वतः जवळील गंगाजळीने कार्यकर्त्यांना मोहून ठेवले आहे. तर काही नेत्यांना दुसऱ्याच्या गंगाजळीने मोहून ठेवले आहे. त्यामुळेच भाजपाच्या झारीत अनेक शुक्राचार्यांची पैदास होत गेली तरीही पक्षश्रेष्ठी गाफील कसे राहिले याचेच नवल वाटते. म्हणून भाजपाच्या झारीत शुक्राचार्य किती? अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.
